मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना आहे.
प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेतील चर्चेची माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे संघटन आपल्यासोबत आले तर महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाची नांदी सुरू होईल. आंबेडकरांनी केलेले वक्तव्य सकारात्मक आहे. आमची इच्छा होती शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यावी.
देशातील आणि महाराष्ट्रातील सत्ता उलथवायची असेल तर या दोन शक्ती एकत्र येणे गरजेचे आहे, असेही राऊत यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांच्या स्वागतासाठी आम्ही तयार असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
ज्यांच्यामागे बहुसंख्य दलित आणि वंचित समाज आहे, असे प्रकाश आंबेडकर आहेत. उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करत आहेत. यावेळी दीपक केसरकर यांनी केलेल्या टीकेवर राऊत म्हणाले की, पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही पुन्हा जेलमध्ये जायला तयार आहोत. आम्ही तुमच्यासारखे पळपुटे आणि लफंगे नाहीत. तुम्ही म्हणजे न्यायालय नाही किंवा कायदा नाही. केसरकर खरेच असे बोलले असतील तर त्यांनी देखील २०२४ मध्ये कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी, असा इशाराही त्यांनी दिला.