रत्नागिरी : ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे. इशारा हा शब्द मुद्दाम वापरतोय. फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप तुम्ही करू नका. हे सांगण्याचं धाडस माझ्याकडे आहे.
तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणतं पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे’’, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते संताप व्यक्त केला.
दरम्यान गेल्या महिन्याभरात शिवसेनेतील सर्वात मोठी बंडखोरी हाच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. अजूनही बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सरकार अधांतरीच असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनंत गीते यांनी सोमवारी रत्नागिरीत झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना बंडखोर आमदारांवर टीका केली आहे
सगळ्यासाठी जबाबदार बेईमान बंडखोरच
यावेळी बंडखोरांवर टीका करताना ते जनतेच्या प्रश्नांसाठी नसून वैयक्तिक स्वार्थासाठी तिकडे गेल्याची टीका अनंत गीतेंनी केली. ‘‘जे सुरू आहे ते दुर्दैवं आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत’’, असं गीते म्हणाले.