रेवाडी : हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जनावरून परतत असताना एका गाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी आहेत. हरियाणाच्या रेवाडी जिल्ह्यात ऑडी गावाजवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझर गाडी मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोराने धडकली. या अपघातातील १२ जखमींना बावल येथील आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्रूझर कारमध्ये १७ जण होते असे सांगण्यात येत आहे. हे कुटुंबीय हरिद्वारला अस्थी विसर्जन केल्यानंतर जयपूरच्या सामोद गावाकडे परतत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.