वारंगल : एका गावामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलग दोन दिवस एका विहिरीत मृतदेह आढळून आले आहेत. पहिल्या दिवशी चार तर दुसऱ्या दिवशी पाच मृतदेह आढळून आल्याची घटना तेलंगणमधील वारंगलजवळ असणाऱ्या एका गावामध्ये घडली आहे. यापैकी सहा जण हे एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांच्या अहवालाच्या आधारे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार; वारंगलजवळ असणाऱ्या गौरीकुंटा गावामधील गोणी शिवण्याचे काम करणाऱ्या एका ४८ वर्षीय कामगाराचे आणि त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचे मृतदेह सापडले असून त्यापैकी दोन मृतदेह या ४८ वर्षीय कामगाराच्या मुलांचे आहेत. तर विहिरीमधून बाहेर काढण्यात आलेल्या मृतदेहांपैकी सहा मृतदेह हे एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असून अन्य एक मृतदेह या कुटुंबाच्या ओळखीतल्या व्यक्तीचा आहे. इतर दोन मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही अशी माहिती वारंगलचे पोलीस आयुक्त व्ही. रविंद्र यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.
Read More सलग दोन दिवस विहिरीत आढळले मृतदेह
गावाजवळ असलेल्या विहिरीमध्ये ४८ वर्षीय कामगाराच्या मृतदेहबरोबरच त्याची पत्नी, मुलगी आणि तीन वर्षाच्या नातवंडाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चारही मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर शुक्रवारी याच विहिरीमध्ये पुन्हा मृतदेह तरंगताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी विहिरीमधील सर्व पाणी उपसून बाहेर काढले तेव्हा त्यांना विहिरीमध्ये इतर पाच मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान, विहिरीमध्ये सापडलेल्या मृतदेहांपैकी कुटुंबाच्या ओळखीतील व्यक्तीचा मृतदेह हा ४८ वर्षीय कामगाराच्या मित्राचा आहे. या कामगाराने आपल्या मित्राला गोणी शिवण्याचे काम असल्याचे सांगून घरी बोलवून घेतले होते. तर इतर दोन मृतदेह हे याच ठिकाणी राहून गोणी शिवण्याचे काम करणाऱ्या दोन मजुरांचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे पीटीआयने आपल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.
आत्महत्येचा प्रकार असावा : या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरु केली असून या मृतदेहावर कुठेही जखमा दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनाकरता पाठवण्यात आले असून त्यानंतर खरं काय ते स्पष्ट होईल.