नाक्यावर २ हजार पोलिसांचा कडक पहारा
कोल्हापूर : एकीकडे जत तालुक्यात पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचतानाच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या बेळगाव दौ-याला विरोध केला आहे. त्यामुळे राज्याच्या २ मंत्र्यांचा शनिवारचा दौरा लांबणीवर पडला असून तो आता ६ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, गनिमीकाव्याने एकही नेता बेळगावमध्ये येऊ नये, म्हणूनन सीमा नाक्यावर २ हजार पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.
कर्नाटकने गुरुवारी जत तालुक्यातील अनेक गावात पाणी सोडले. तिकोंडी, भिवर्गी, उमदीसह अनेक गावात या पाण्याचे पूजन करून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राने म्हैशाळ योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली. त्यानुसार मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारीपूर्वी या योजनेची निविदा काढण्याचे आदेश दिले.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे शनिवारी बेळगाव दौ-यावर जाणार होते. पण त्यांचा हा दौरा आता ६ डिसेंबरला होणार आहे. या दिवशी ते सीमा भागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत. याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये, म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमा भागातील २१ नाक्यावर २ हजार पोलिस तळ ठोकून आहेत.
राज्य राखीव दलाच्या तुकड्याही तैनात
सीमा भागात ६ डिसेंबरपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी तळ ठोकून आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सीमा भागातील मराठी बांधवातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.