३० जूनपर्यंत बदली करता येणार नाही
मुंबई : महाराष्ट्र सरकारने प्रशासकीय बदल्यांबाबत आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोणतीही प्रशासकीय बदली आता ३० जूनपर्यंत करता येणार नाही. अगदी एखादा अपवाद असेल आणि आवश्यकता असल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने एखाद्या अधिकारी किंवा कर्मचा-यांची बदली केली जाऊ शकते. विशेष म्हणजे राज्य सरकारने मे महिन्यात बदल्या करा, असा आदेश दिला होता. पण त्यानंतर आता राज्य सरकाने थेट ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याचा आदेश दिला आहे.
पुढच्या महिन्यात २० जूनला विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या सहा जागांचीदेखील निवडणूक जवळ आली आहे. या दोन निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने प्रशासकीय बदल्यांना ब्रेक दिला आहे. या दोन्ही निवडणुकीदरम्यान आमदारांची नाराजी सरकारला ओढवून घ्यायची नाही. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि कर्माचा-यांच्या बदल्या एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारने आधी मे महिन्यातच बदल्या करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आता चालू वर्षात बदल्या ३० जूनपर्यंत करण्यात येऊ नये, असा नवा आदेश सरकारने काढला आहे. तसेच तातडीची बदली करायची झाल्यास मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असेल, असा नवा जीआर राज्य सरकारने काढला आहे. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात मे महिन्यात नियमांनुसार बदल्या कराव्यात, असा जीआर काढला होता. त्यानंतर आता ३० जूनपर्यंत बदल्या न करण्याचा जीआर काढला आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे प्रशासकीय बदल्या झालेल्या नाहीत. त्यातच आता सरकारने बदल्यांबाबत नवा जीआर काढल्याने ही प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बदली तातडीने करू नये, अशी मागणी केली होती, अशीदेखील माहिती समोर आली आहे.