मुंबई : राज्यात तीन लॅब होत्या. आता राज्यात 530 लॅब तयार झाल्या आहेत. राज्यातील गावागावात, घराघरात आरोग्य पथके जाणार असून तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये कायमस्वरुपी हॉस्पिटल उभारणार आहोत. कृषी उद्योगाकडेही लक्ष देणार, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याचबरोबर प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
आजपर्यंत आरोग्य हा विषय मागे पडला होता. मला तुमच्याकडून सहकार्य हवे आहे. जनतेला कोरोनासोबत कसे जगावे हे शिकविण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट हे शेवटचे आहे असे नाहीय. ही नांदी देखील असू शकते. लस कधी येणार माहिती नाही. आपला हात हीच आपली लस आहे. यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम सुरु करत आहोत. दुबईत कायदे एवढे कडक आहेत की काही हजारांत दंड होतो. आपल्याकडे ते शक्य नाही. यामुळ जनतेला हित समजावले जाणार आहे, असे ठाकरे म्हणाले.
गावागावात कोरोना दक्षता समिती स्थापण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक आदी आहेत. काही ठिकाणी अंमलबजावणी केली जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल. यामधील सुचनानुसार आवश्यक असेल तरच बाहेर पडा आदी सूचना आहेत. 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर एक मोहिम राबविणार आहोत. या काळात महाराष्ट्रातील एकही घर असे राहू द्यायचे नाही. आरोग्य टीमने प्रत्येक घरात जाऊन चौकशी करावी. डॉक्टर तपासणी करतील. य़ा पथकाने घराघरात जाऊन नागरिकांची चौकशी करावी, सुरुवातीला झोपडपट्टीमध्ये व्हायरस जाईल असे वाटले होते. पण आता गावागावात मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. गणेशोत्सव काळात घरात जमलेले 30-30 सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत. यामुळे ही जनजागृतीची मोहिम राबवत आहोत.
यानंतरचा दुसरा टप्पा 12 ते 24 ऑक्टोबर असा आहे. या काळात ज्येष्ठ नागरिकांचे आजार, त्यांना होणारे त्रास आदींची माहिती घेतली जाणार आहे. गरज पडल्यास तपासणी केली जाईल. गावागावात तीन जणांचे पथक असेल, गावपातळीवर हे करायचे आहे. सरपंच, नगरसेवक यांच्यावर ही जबाबदारी आहे. जनजागृतीसाठी हे आवश्यक आहे. तसेच विविध स्पर्धाही आयोजित केल्या जातील निबंध स्पर्धा असतील, त्यांना बक्षिसे दिली जातील, गावांच्या दक्षता समित्यांनी याला मदत करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
डिसेंबरच्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्तीचं वचन दिलं होतं, जवळपास २९.५ लाख शेतकऱ्यांना आपण कर्जमुक्त करू शकलो आहोत. तसेच येत्या वर्षभरामध्ये साधारणत: ६.५ लाख आदिवासी आणि कुपोषित बालकांना आपण मोफत दूध भुकटी देणार आहोत, असेठाकरे म्हणाले.
नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड