वॉशिंग्टन : देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (दि.१६) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,७१,२०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र अशातच वॉशिंग्टनमधील भारतीय शास्त्रज्ञाने कोरोनाची साथ जास्त दिवस टिकणार नसून लवकरच तिचा अंत होईल, असे म्हटले.
डॉ. कुतुब महमूद असे या शास्त्रज्ञाचे नाव असून कोरोनामुळे मृत्यू होणे टाळण्यासाठी सर्वांनी लसीकरण करून घेणे हाच महत्त्वाचा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोनादेखील संपेल, मात्र सध्याच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग खूप वेगवान असल्याने गंभीर आजार असणा-या लोकांनी लस घेतली नसल्यास त्यांच्या जीवाला धोका संभवतो, त्यामुळे सर्वांनी लसीकरण करुन घेणे खूप महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
विषाणूनुसार माणसाच्या रोगप्रतिकार क्षमतेत सुधारणा
व्हायरस आणि माणूस यांच्यात हे एक साधर्म्य आहे. विषाणू जसे आपले स्वरुप बदलतो, तसेच माणसाची रोगप्रतिकारक क्षमताही स्वत:ला विकसित करत असते. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्स्ािंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटिव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण कोरोनाविरुद्ध वापरली आहेत, असेही डॉ. कुतुब यांनी सांगितले. देशात केवळ १२ महिन्यात जवळपास ६० टक्के लसीकरण साध्य होणे ही नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी लसीकरणाचे कौतुक केले.