औरंगाबाद : शहरातील गजानन नगरमध्ये शामसुंदर कळंत्री (वय ६१) आणि किरण कळंत्री (वय ४५) यांची हत्या करण्यात आली.एकामागोमाग एक हत्येच्या घटनांमुळे औरंगाबाद शहर हादरले आहे. आजदेखील शहरातील गजानन नगर परिसरातील गल्ली क्रमांक ४ येथे एका दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शामसुंदर हिरालाल कळंत्री (वय ६१) आणि किरण शामसुंदर कळंत्री (वय ४५), असे या दाम्पत्याचे नाव आहे.
दोन दिवसांहून अधिक वेळ दोघांचे मृतदेह घरात पडून होते. त्यामुळे आज परिसरात दुर्गंधी पसरली होती. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घराचा तपास केला असता घरातील खालच्या मजल्यावर एक आणि वरच्या मजल्यावर एक असे दोन मृतदेह पोलिसांना आढळले. हे मृतदेहदेखील कुजलेल्या अवस्थेत होते.
मृत शामसुंदर कळंत्री यांची किरण कळंत्री ही दुसरी पत्नी होती.
गजानगरमध्ये हे दाम्पत्य आपल्या मुलगा व मुलगीसोबत राहत होते. मुलीने दिलेल्या माहितीनूसार, शनिवारी शामसुंदर यांनी तिला एसबी कॉजेलमध्ये सोडले होते. नंतर दुपारी आपण गावी जाणार असल्याचे सांगत वडीलांनी आपल्याला काकांच्या घरी जाण्यास फोन करुन सांगितले. त्यामुळे आपण कॉलेजनंतर काकांच्या घरी गेलो, असे मुलीने सांगितले आहे. मात्र, या घटनेनंतर शामसुंदर यांचा मुलगा आकाश कळंत्री फरार झाला आहे. तसेच, मुलीला त्यानेच वडीलांच्या नावाने फोन केल्याचा संशय आहे. त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
मृत शामसुंदर यांच्या मुलीकडे चौकशी करताना पोलिस.
उपायुक्त दिपक हिरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल ढुमे, पुंडलिक नगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे यांच्यासह फॉरेन्सिक टीम व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.