मुंबई : गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतक-यांचे पीक विम्याचे पैसे ३१ मेपर्यंत देणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान परिषदेत दिली आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी यातून सुटणार नाही, यासाठी सर्व जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत असे देखील सत्तार म्हणाले.
सत्तार म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २१ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ५० लाख शेतक-यांना २३०५ कोटी रुपये नुकसानभरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केले आहे. ही योजना केंद्र सरकारची आहे. महाराष्ट्र सरकारला काही अधिकार नाहीत.
राज्यातील सरकार शेतक-यांच्या पाठीशी असून, त्यांना पूर्णपणे मदत करत असल्याचा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून सतत केला जात आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरकार स्थापन होताच राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात येणार असल्याचा दावा केला होता. पण असे असताना राज्यातील शेतकरी आत्महत्या काही थांबत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातच एकापाठोपाठ शेतक-यांनी गळफास घेत आत्महत्या केल्या आहेत.
सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतक-यांच्या शेतात प्रचंड नुकसान केले होते. काढण्यासाठी आलेला गहू, ज्वारी, हरभरा, मिरची, पपई, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहिल्या वेळेस झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असताना दुस-यांदा झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारी कर्मचा-यांच्या संपामुळे शेतक-यांच्या शेतातील पंचनाम्यांना ब्रेक लागला आहे. नुकसानीचे पंचनामे त्वरित करावेत, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.