छत्रपती संभाजीनगर : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याला पुन्हा एकदा आता अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक पावसाचा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी अक्षरश: गारपीट पाहायला मिळाली.
दरम्यान मराठवाड्यात ६ ते ८ आणि १४ ते १७ मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत या काळात पाच मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे विभागात २१ जनावरांचा जीव गेला आहे. वीज कोसळून हिंगोलीत एक, तर परभणीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अवकाळी पावसामुळे २२ नागरिक जखमी झाले आहेत. तर ८ मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत एक हजार हेक्टर, बागायत दोन हजार ५५ हेक्टर, तर १७ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच १४ ते १७ मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १५२ हेक्टर, तर नांदेडमध्ये सर्वाधिक ४ हजार ७९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
विभागात जनावरांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये ८ जनावरांचा मृत्यू
जालना ९ जनावरांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यात १५ जनावरांचा मृत्यू
हिंगोलीत ०३ जनावरांचा मृत्यू
बीडमध्ये ०३ जनावरांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट
अवकाळी पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील बसला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यात अक्षरश: गारपीट पाहायला मिळाली. त्यामुळे केळी, गव्हासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. तर अजिंठा लेणी परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नद्यांना पूर आल्याचे पाहायला मिळाले. तर अजिंठा लेणी परिसरातील धबधबे ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळाले.
लातूरलाही अवकाळीचा फटका…
अवकाळी पावसाचा फटका लातूर जिल्ह्याला देखील बसला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. त्यात निलंगा, औराद शाहजानी, कासार बालकुंदा, मानेजवळगा या भागात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. पावसाने सकाळपर्यंत पाठ सोडली नव्हती. सकाळी पावसाचा पुन्हा जोर वाढला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली आहे.