नवी दिल्ली: वृत्तसंस्था
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेल्या लॉकडाउनमुळे हाताला कामच शिल्लक न राहिल्याने अनेक राज्यांतील श्रमिक शहरे सोडून स्वत:च्या गावची वाट धरू लागले आहेत. ही बाब दुर्दैवी असली तरी अशा बिकट परिस्थितीत शहरांचे विक्रेंदीकरण करून गावे, मागास आणि दुर्गम भागांचा विकास करण्याची संधी साधायला हवी, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
आपल्याला कोरोनासोबत जगण्याची कला शिकायला हवी. कोणीही आपले गाव सोडून मोठ्या शहरांमध्ये स्वखुशीने येत नाही. दारिद्रय आणि गावी नसलेली उत्पन्नाची साधने यामुळे श्रमिकांना शहरात धाव घ्यावी लागते. परंतु दारिद्रय आणि भीतीच्या छायेखाली वावरणाºया या श्रमिकांना आता जबरदस्तीने परतीची वाट धरावी लागली आहे. त्यांच्यासाठी आम्ही टोल नाक्यावर अन्नाची व्यवस्था केली आहे, परंतु आता त्यांच्यात सकारात्मकता रुजविण्याची गरज आहे, असेही गडकरी म्हणाले.
Read More गुंतवणुकीचा ट्रेंड बदलतोय; गोल्ड ईटीएफना वाढती पसंती
महाराष्ट्रातील धारावीमध्ये १.५ लाख लोक चर्मोद्योगावर अवलंबून आहेत. आगामी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ठाण्यामधून जातो. येथे पुरेशी जागा उपलब्ध आहे. मी महाराष्ट्र सरकारला सुचवू इच्छितो की, आपण येथे चर्मउद्योग उभारू शकतो आणि धारावीतील सुमारे दीड लाख लोक येथे स्थलांतरित होऊ शकतील. त्यांना येथे परवडण्याजोगी घरेही मिळतील आणि चांगले आयुष्य व्यतित करण्याची संधीही, असेही गडकरी म्हणाले.
भारतातील चर्मोद्योग हा १.४५ लाख कोटींचा आहे, त्यातील ८५ हजार कोटींचा स्थानिक व्यवसाय आहे़ तर सुमारे ४५ हजार ते ५५ हजार कोटींचा माल निर्यात केला जातो. जर महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला तर आपण कामास सुरुवात करू शकतो आणि हाच पर्याय देशाच्या अन्य भागांतही लागू करता येऊ शकतो, असा पर्यायही त्यांनी सुचवला.
एक लाख कोटी खर्चून उभारल्या जाणा-या दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेमुळे या दोन्ही शहरांमधील अंतर २२० किमीने कमी होईल आणि अशा शहरांचे विकेंद्रीकरण होईल. हा रस्ता हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील मागास भागातून जात आहे. त्यामुळे येथे अनेक उद्योग उभे राहू शकतात. हा झाला दीर्घकालीन उपाय, मात्र सध्या श्रमिकांच्या तातडीच्या प्रश्नाचे काय यावर उद्योगजगत त्यांना पुन्हा कामावर रुजू होण्यास तयार करतील, असेही गडकरी म्हणाले.