रत्नागिरी : कोकणातील हापूसला जगाच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. मात्र, यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. मागील २० वर्षांच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. बदलते वातावरण आणि पिकावर पडणारा रोगाचा प्रादुर्भाव याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी संकटात आहेत.
सध्या वातावरणात सातत्याने चढ-उतार होत आहेत. पहाटे थंडीचा कडाका आहे तर दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मात्र मोठा फटका बसत आहे. त्यामुळ शेतकरी चिंतेत आहेत. वाढत्या उष्णतेचा मोठा फटका हापूस आंब्याला बसत आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतक-यांपुढे नवे संकट उभे राहिले आहे. तसेच आंब्यावर थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
उष्णतेमुळे आंब्यावर डाग
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसा तापमानात झालेल्या वाढीमुळे उष्माघाताचा फटका आंब्याला बसला आहे. बहुतांश ठिकाणी आंब्यावर डाग उठल्याने आंबे खराब होऊन गळू लागले आहेत. यामुळे जगप्रसिद्ध कोकणच्या हापूसचे पहिल्या टप्प्यातील पीक धोक्यात आले आहे. तसेच यंदा ९० टक्के आंबा बागा मोहरल्या नसल्याने कोकणच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे.
हापूसचा तुटवडा भासणार
बदलत्या वातावरणामुळे आंब्याला कमी बहर आल्याने १५ एप्रिल ते १५ मे यादरम्यान हापूसचा तुटवडा भासणार असल्याची माहिती आंबा उत्पादक शेतक-यांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षी हापूस आंब्याचे अर्थचक्र बिघडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे.