मुंबई : आयपीएलच्या ६४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जवर १७ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दिल्ली संघाने गुणतालिकेत सहाव्या स्थानापासून थेट चौथ्या क्रमांकवर झेप घेतली, तर दुसरीकडे या सामन्यात पराभव झाल्यामुळे पंजाब किंग्ज संघ प्लेऑफपर्यंत पोहोचण्याची शक्यता धुसर झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने पंजाबसमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र पंजाब संघ १४२ धावा करू शकला.
दिल्लीने दिलेल्या १६० धावांचे लक्ष्य गाठताना पंजाब संघ पूर्णपणे ढासळला. पंजाबचा जितेश शर्मा वळगता एकाही संघाला चांगली फलंदाजी करता आली नाही. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टो (२८) आणि शिखरÞ धवन (१९) यांनी खास खेळी केली नाही. तसेच भानुका राजपक्षे (४), लियाम लिव्हिंगस्टोन (३), मयंक अग्रवाल (०) यांनी निराशा केली. हे महत्त्वाचे खेळाडू बाद झाल्यामुळे पंजाब किंग्जची दुर्दशा झाली.
त्यानंतर पाचव्या विकेटसाठी आलेल्या जितेश शर्माने संघाला सावरण्याचा चांगला प्रयत्न केला. त्याने ३४ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. जितेश मैदानात असेपर्यंत पंजाबच्या विजयाच्या आशा होत्या. मात्र शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला आणि पंजाबजच्या हातातून सामना गेला. शेवटच्या फळीतील राहुल चहर (१८) वगळता एकही फलंदाज १० पेक्षा जास्त धावा करु शकला नाही. परिणामी दिल्ली कॅपिट्लसचा १७ धावांनी विजय झाला.
यापूर्वी सुरुवातीला फलंदाजीसाठी येत दिल्ली कॅपिटल्स चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र डावाच्या पहिल्याच चेंडूवर सलामीला आलेला डेविड वॉर्नर झेलबाद झाल्यामुळे दिल्ली संघावरील दबाव वाढला. दिल्लीच्या मिचेल मार्शने (६३) अर्धशतकी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले, तर सरफराज खान (३२), ललित यादव (२४), अक्षर पटेल (१७) या तीन खेळाडूंनी समाधानकारक फलंदाजी केली. ज्यामुळे वीस षटके संपेपर्यंत दिल्लीला १५९ धावा करता आल्या.