मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. बारसू येथील प्रकल्पामध्ये शरद पवार आता मध्यस्थी करणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी बारसू येथील जागेसंदर्भात केंद्राला पत्र दिले होते. त्यामुळे या प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय आहे अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्थानिकांची बाजू घेतली आहे. अशातच शरद पवार बारसूच्या संदर्भात माहिती घेत आहेत.
या दरम्यान शरद पवार यांनी सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी काल चर्चा केली. त्यानंतर आज त्यांनी भेट घेतली. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार विनायक राऊत स्थानिक नेते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बारसू येथील स्थानिकांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. रानतळे चेकपोस्टवर विनायक राऊत यांची गाडी अडवण्यात आली आहे. बारसू येथे कलम १४४ लागू केले असल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकल्पाला समर्थनच – राजन साळवी
राजन साळवी यांनी आज ट्वीट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्यावर प्रकल्पाला समर्थनच….माझ्या विरोध करणा-या नागरिकांना प्रकल्पाची बाजू प्रशासनाने पटवून द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, अशी मागणी राजन साळवी यांनी केली आहे. तसेच राजन साळवी यांनी मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्वीटर अकाऊंट आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेन्शन केले आहे.