पुणे : गेल्या अडीच वर्षांतील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती जो योग्य मेसेज देईल.
जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले असल्याचे विधान पुणे येथे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यात सर्वांना तेव्हा मोठा धक्का बसला जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:ऐवजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असे जाहीर केले.
राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस हेच बॉस असल्याचे अनेकदा दिसले. आता चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले असल्याने राजकीय वातावरण नक्कीच तापणार.