नाशिक : राज्यात सर्वांत जास्त कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. यामुळे आशियातील सर्वांत मोठी कांद्याची मोठी बाजारपेठ आहे. दरम्यान अवकाळी पाऊस, राज्य सरकारची धोरणे यामुळे पुन्हा नाशिक जिल्ह्यातच कांदा शेतक-यांना रडवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत हे दर आणखी खाली कोसळतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
१५ दिवसांपूर्वी ज्या उच्च प्रतीच्या कांद्याला क्विंटलला तीन ते चार हजार रुपये भाव मिळत होता, तोच कांदा आज व्यापा-यांकडून दीड ते दोन हजार रुपयांनी खरेदी केला जात आहे. यामुळे नाशिकमध्ये कांद्याचे दर पडल्याचे दिसत आहे. हा कांदा दर पडल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतक-यांनी संताप व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावे
मागच्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतक-यांना वा-यावर सोडणार नसल्याचे सांगितले होते. परंतु कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याने याकडे कोणी लक्ष देणार का? असा सवालही शेतक-यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान कांद्यापाठोपाठ राज्यात टोमॅटो उत्पादक शेतकरीही संकटात सापडला आहे. टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्याने टोमॅटोला कवडीमोल दराने भाव मिळत आहे. कांदा आणि टोमॅटोच्या घसरणीमुळे शेतक-यांच्या हातात चार पैसेही रहीत नसल्याचे सध्या चित्र आहे.
राजस्थानमधील नवीन कांद्याची होणारी आवक, मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणावर आलेला कांदा, यासोबतच कर्नाटकच्या शेतक-यांनी उशिरा केलेली कांद्याची लागवड याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याचे दर कोसळले असून येत्या काही दिवसांत हे दर आणखी खाली येतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. असे झाले तर कांदा उत्पादक शेतकरी आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे.