रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करण्याचे आवाहन
लातूर : इस्लाममध्ये पवित्र रमजान महिन्याला अनन्यसाधारण महत्व आणि स्थान आहे. परंतु यावर्षीचा रमजान सण कोरोना संकटाच्या सावटाखाली आल्यामुळे महिनाभर मुस्लीम बांधवांनी घरीच प्रार्थना करुन सरकारी नियमांचे पालनही केलेले आहे. आता रमजान ईदला सुद्धा घराबाहेर न पडता घरात थांबूनच ईद-उल-फित्र साजरी करावी आणि समाजापुढे एक आदर्श घालून द्यावा, असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकारी महर्षि दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
ते म्हणाले की, देशावर कोरोनाचे आलेले संकट पाहता सर्व मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने रमजानचा महिना घराबाहेर न पडता, गर्दी न करता शासनाने वेळोवेळी घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पार पाडला. रामनवमी, हनुमानजयंती, गुढीपाडवा, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीही सर्वांनी साध्या पद्धतीने व शांततेने साजरी केली, यंदाचा ईद- चा उत्सवही अशाच प्रकारे साजरा करावा. तसेच ईदच्या निमित्ताने सर्व जाती धर्मातील गोरगरीब, गरजू, कामगार यांना आवश्यक ती मदत करावी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा न देता फोन एसएमएस,फेसबुक, व्हॉट्सएप सारख्या समाजमाध्यमाचा वापर करुन शुभेछा द्याव्यात असे आवाहन करुन त्यानी जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत