बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर भारताने चौथ्यांदा उमटवली मोहोर
अहमदाबाद : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. यासह भारताने पुन्हा एकदा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २-१ ने जिंकली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निकाल गेल्या ६ वर्षांपासून बदललेला नाही. भारताने शेवटच्या ४ ट्रॉफीवर नाव कोरले आहे.
२०१७, २०१९, २०२१ आणि आता २०२३ मध्ये भारताने ट्रॉफी जिंकली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने नागपूर आणि दिल्ली कसोटीत एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र, इंदूरमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने आपले खाते उघडले. अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. पण ते होऊ शकले नाही. अहमदाबादमध्ये प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावा केल्या. यानंतर भारताने पहिल्या डावात ५७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने ५ व्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत २ बाद १७५ धावा केल्या होत्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकताच भारतीय संघाने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
घरच्या मैदानावर भारताची धडाकेबाज खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १६ वी कसोटी मालिका जिंकली आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संयुक्तपणे प्लेअर ऑफ द सीरीज राहिले. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० प्लेयर ऑफ द सिरीज जिंकणारा अश्विन हा दुसरा खेळाडू आहे. मुथय्या मुरलीधरन ११ पुरस्कारांसह अव्वल स्थानावर आहे. उस्मान ख्वाजाने या मालिकेत सर्वाधिक ३३३ धावा केल्या, तर विराट कोहली २९७ धावांसह दुस-या क्रमांकावर आहे.
चौथ्या कसोटी सामन्यात विराट कोहली सामनावीर ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये ४० महिन्यांनंतर त्याने हा पुरस्कार जिंकला. त्याने कसोटीत दहाव्यांदा हा पुरस्कार जिंकला. कोहलीने १८६ धावांची इनिंग खेळली होती. कोहलीला १० ऑक्टोबर २०१९ रोजी कसोटीत अखेरचा सामनावीर किताब पटकावता आला होता. पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने नाबाद २५४ धावांची खेळी केली होती.
भारताने घरच्या मैदानावर सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली. यापूर्वी २०१७, २०१९ आणि २०२१ मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते. चौथ्या कसोटीत कोहलीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली. सलग ४१ डावांनंतर त्याच्या बॅटमधून शतक झळकले.