मुंबई : जी व्यवस्था देशाला उद्ध्वस्त करत आहे, त्या व्यवस्थेला बाजूला करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचे मत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. ‘सध्या जागावाटपाचा विषय नसून भाजपला सत्तेच्या बाहेर कसे करायचे’ हा विषय महत्त्वाचा असल्याचे पटोले म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे पटोले म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
पुढे बोलताना पटोले म्हणाले, भाजप महाराष्ट्रात आम्ही अमरपट्टा घेऊन आलो आहोत, अशा थाटात वागत आहे, जे चुकीचे आहे. कसब्यामध्येही भाजप निवडून येईल असा दावा करत होता. पण त्या ठिकाणी आमचा उमेदवार निवडून आल्याचे पटोले म्हणाले.
भाजपच्या विरोधात प्रामाणिकपणे जे असतील त्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव अद्याप आला नाही. त्यांचे नेमके मत काय आहे, हे समजल्याशिवाय आम्ही त्यांचीशी बोलणार नाही. पुढच्या काळात कुठेही धोका होता कामा नये याची काळजी आम्ही घेत आहोत. कारण जनतेचा राग हा सत्तेत बसलेल्या लोकांच्या विरोधात आहे. त्या रागाला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू व्हावी
काँग्रेसच्या ताब्यात असणा-या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आम्ही जुन्या पेन्शन योजनेचा उल्लेख करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रातही जुनी पेन्शन लागू व्हावी हीच आमची भूमिका आहे.