मुंबई, 03 जून : निसर्ग चक्रीवादळ गुजरात आणि महाराष्ट्राकडे सरकत आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे चक्रीवादळ मुंबईत धडकेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग वाढला आहे. 40 वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा धोका निर्णय झाला आहे. याआधी दोन वेळा 1948 आणि 1980 रोजी मुंबईला चक्रीवादळाचा धोका होता. 1980 रोजी आलेलं चक्रीवादळ समुद्रातच शांत झाल्यानं मुंबईत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं नाही मात्र 1948 रोजी आलेल्या वादळानं मुंबईला मोठा तडाखा बसला होता.
1948 रोजी मुंबईत आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित झाला होता. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून रस्त्यावर पडल्यानं रस्ते बंद झाले होते आणि अनेक घरांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झालं होतं. 1948 मध्ये आलेल्या चक्रीवादळानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. हार्बर परिसरातील अनेक भागांमध्ये खूप जास्त नुकसान झाल्यानं नागरिकांना या वादळाचा मोठा फटका बसला होता.
Read More आसामच्या विविध भागात दरडी कोसळून 20 ठार
1948 नंतर पुन्हा 22 वर्षांनी 80 सालात वादळ धडकणार होतं मात्र मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावरच ते शांत झाल्यानं धोका कमी झाला. मात्र निसर्ग चक्रीवादळ काही क्षणात मुंबईसह अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे. ताशी 100 ते 110 किमी वेगानं वारे वाहू लागले आहेत. रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईत बुधवारी दुपारपर्यंत हे वादळ धडकेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीज पुरवठा खंडित केला जाण्याची शक्यता आहे. एनडीआरएफ टीम आणि पोलीस अनेक किनारपट्टीवर तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या चक्रीवादळानं पुन्हा 1948 ची स्थिती निर्माण होणार का अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.