नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सैन्यात भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना आणली आहे. या योजनेविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरुन निषेध करत असून, अनेक राज्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये योजनेच्या विरोधात हिंसक निदर्शने होत आहेत.
दरम्यान, या योजनेविरोधात देशभरातील अनेक संघटनांनी आज(२० जून) भारत बंदची घोषणा केली आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर राज्यांतील पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वेला नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी जीआरपी आणि आरपीएफनेही तयारी केली आहे.
हरियाणामध्ये या आंदोलनाबाबत यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये ंिहसक निदर्शने झाली होती. अशा स्थितीत भारत बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फरिदाबाद पोलिसांनी आपली सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा पोलिसांचे म्हणणे आहे की, गौतम बुद्ध नगरमध्ये कलम १४४ आधीपासूनच लागू आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल. ग्रेटर नोएडातील यमुना एक्सप्रेस वेवर शुक्रवारी झालेल्या आंदोलनाप्रकरणी २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली बॉर्डरवर मोठा ट्रॅफिक जाम
देशभरात बंदचा परिणाम दिसून येत आहे. भारत बंदमुळे दिल्ली-गुरुग्राम सीमेवर मोठा जाम झाला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बिहारमध्येही तरुणाई बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे. फोनवरुन चुकीची माहिती प्रसारित होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडक शब्दात इशारा दिला आहे. गैरप्रकार करणा-यांवर कडक कारवाई करण्यासाठी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
अनेक रेल्वे रद्द
अग्निपथ योजनेच्या विरोधातील आंदोलनाचा सर्वाधिक फटका रेल्वेला बसला आहे. अनेक गाड्यांची जाळपोळ झाल्यानंतर आता आज १८१ मेल एक्सप्रेस रद्द तर ३४८ पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ४ मेल एक्सप्रेस आणि ६ पॅसेंजर गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.