नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी नगरोटा येथील टोलनाक्यावर झालेल्या चकमकीत लष्कराने पाकिस्तानमधून आलेल्या चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या दहशतवाद्यांनी भुयारातून भारतीय हद्दीत घुसल्याचे उघडकीस आले होते. मंगळवारी भारतीय जवानांनी याच भुयारांचा वापर करीत पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक दिली.
भारतात घुसखोरी करण्यासाठी त्या चार दहशतवाद्यांनी वापरलेल्या भुयारातून भारतीय जवान पाकव्याप्त काश्मीमध्ये सुमारे २०० मीटरपर्यंत आत गेले होते, अशी माहिती केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाºयाने दिली आहे. हे जवान भुयाराच्या सुरुवातीपर्यंत पोहोचले होते,असेही त्यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दहशतवाद्यांनी घुसखोरीसाठी वापर केलेल्या १५० मीटर भुयाराचा शोध सुरक्षा दलांनी घेतला होता. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून फोनही जप्त केले होते. या फोनमधूनच या भुयाराची माहिती मिळाली होती.
बीएसएफ जम्मूचे फ्रंटियर, इन्स्पेक्टर जनरल एन.एस.जामवाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. भुयाराच्या रचनेवरुन हे भुयार काही दिवसांपुर्वीच केले असावे,असे वाटते. भुयार सुमारे १५० मीटर लांब असून त्याच्या नवीनपणामुळे याच भुयारातून दहशतवादी भारतात घुसले असावेत, असे वाटते. तसेच या दहशतवाद्यांना मार्ग दाखवणारा कुणीतरी वाटाड्या होता. तोच त्यांना महामार्गापर्यंत घेऊन गेला असावा, असेही निदर्शनास येते , असे जामवाल यांनी सांगितले.
भुयाराचे तोंड दाट झाडीमध्ये खबरदारीपूर्वक लपवण्यात आले होते. त्यावर माती आणि रानटी झाडे टाकून ते दिसणार नाही याची काळजी घेतली होती. भुयाराचे तोंड मजबूत करण्यात आले होते. त्यावर पाकिस्तानी चिन्हे असलेल्या वाळूच्या पिशव्या होत्या. हे नव्याने खोदलेले भुयार होते. तसेच त्याचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला होता, असेही सांगण्यात आले.
कोरोना संपलेला नाही, काळजी घ्या