बर्मिंगहम : भारतीय महिला क्रिकेट संघाने बर्मिंगहम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास रचला. त्यांनी यजमान इंग्लंडचा ४ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. त्यात भारतीय संघाने फायनल गाठून इतिहास रचला. भारतीय संघाने रौप्य पदक निश्चित केले असले तरी त्यांच्याकडून आता सुवर्णाची अपेक्षा असणार आहे.
भारताने इंग्लंडसमोर १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडला २० षटकांत ६ फलंदाजांच्या मोबदल्यात १६० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून स्मृती मानधना दमदार खेळी करत ३२ चेंडूत ६१ धावा केल्या. तर जेमिमाह रॉड्रिग्जने ४४ धावांची झुंजार खेळी करत भारताला २० षटकात १६४ धावांपर्यंत पोहचवले. त्यानंतर गोलंदाजीत दिप्ती शर्माने १ तर स्रेह राणाने २ विकेट घेतल्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन फलंदाज धावबाद करत विजयात आपला मोलाचा वाटा उचलला.