मुंबई : औरंगाबादचं नामांतर संभाजी नगर करण्याची मागणी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणून ठराव मंजूर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. वांद्रे पूर्वेतील शासकीय वसाहतीतील रहिवाशाी जागेची मागणी करत होते. सरकारी कर्मचाऱ्यांना तिथेच घरे मिळावीत, अशी त्यांची मागणी होती. यासाठी भूखंड वितरीत करावा अशी मागणी करण्यात आली होती. ही मागणीही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आहे, असं त्यांनी सांगितलं.