मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचे परिपत्रक जारी केले आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण-डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील या महापालिकांच्या निवडणुकाची अंतिम प्रभागरचनादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकांच्या कामाला राज्य निवडणूक आयोगाकडून गती देण्यात येत आहे. १० मार्च २०२२ ला राज्य सरकारने कायदा करत प्रभाग रचना निश्चित करण्याचे काम त्यांच्याकडे घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा पुन्हा राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना प्रसिद्ध केली. सर्वोच्च न्यायालयाने जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षणासाठी आवश्यक असलेली त्रिस्तरीय चाचणी होत नाही, तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही, असा आदेश दिलेला आहे.
आक्षेप, हरकतींवर विचार करून निर्णय
राज्यातील १४ महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मुंबई वगळता राज्यातील नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिकांची आरक्षण सोडत ३१ मे रोजी जाहीर होईल. त्यापूर्वी २७ मे रोजी यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण सोडतीवरील आक्षेप आणि हरकतींवर विचार करून अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.