आगरतळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज (बुधवार) दुस्-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहादेखील उपस्थित होते. आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर हा सोहळा सुरू आहे.
सीएम माणिक साहा यांच्यानंतर संताना चकमा, प्रणजित सिंग, सुशांत चौधरी, रतन लाल नाथ, टिंकू रॉय, विकास देबबर्मा, सुधांशू दास आणि सुक्ला चरण नोआटिया यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तत्पूर्वी, आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हेही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. शपथविधी आधी माणिक साहा यांनी आगरतळा येथील लक्ष्मीनारायण हाऊसमध्ये प्रार्थना केली.
भाजप-आयपीएफटी आघाडीला ११ जागांवर नुकसान
त्रिपुरामध्ये भाजप आणि आयपीएफटीने युती करून निवडणूक लढवली. त्यांना २०१८ च्या निवडणुकीच्या तुलनेत ११ जागांचे नुकसान झाले. त्यानंतरही या आघाडीने ३३ जागा जिंकून बहुमत मिळवले. राज्यात भाजपला ३२, तर आयपीएफटीला फक्त १ जागा मिळाली.
दुसरीकडे, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सीपीआय(एम) आणि काँग्रेस आघाडीने राज्यात १४ जागा जिंकल्या आणि २ जागांचे नुकसान झाले होते. तर, टीपीएमने राज्यात १३ जागा जिंकल्या होत्या.