पुणे/मुंबई : मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला असून मान्सूनच्या प्रवासासाठी सध्या अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिणेकडून प्रवास करीत मान्सून अरबी समुद्रात आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर दाखल झाला आहे. नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मान्सून केरळमध्ये तर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवार दि. २२ मे रोजी वर्तविला आहे.
बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळवर सध्या आलेले ढग मोठ्या आकाराचे आहेत. या ढगांमुळे मोटा पाऊस पडतो, यामुळे पिके उध्वस्त होतात. झाडे उन्मळून पडतात असे काही वैज्ञानीकांचे म्हणणे आहे.
१२ मे १५ जूनपर्यंत राज्यात सक्रिय : कश्यपी
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात ५ जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर १२ जून ते १५ जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. यंदाही महाराष्ट्रात मान्सून दरवर्षीप्रमाणे पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले.
पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका : कृषिमंत्री भुसे
मान्सूनपूर्व पाऊस जरी कोसळत असला तरीही, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतक-यांना केले आहे. यंदा ९९ टक्के पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. मान्सून वेळेपूर्वीच राज्यात दाखल होत आहे, पण पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असेही दादाजी भुसे म्हणाले. कारण गेल्या काही वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर बियाणे, खते व मेहनत वाया जाते. त्यामुळे घाई करू नका, असे आवाहन भुसे यांनी केले.