मुंबई : शिवसेनेला खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आव्हाड पोहोचले आहे. ही भेट कशासाठी हे मात्र अद्याप कळू शकले नाही.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते हजर आहेत. ही बैठक सुरू असताना जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री झाल्यापासून माझी आणि त्यांची भेट झाली नव्हती. माझ्या भागातील विकासकामांसाठी मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. आधीच्या मुख्यमंत्र्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, असे म्हणत आव्हाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
ठाण्यातील बायपास खराब झाला आहे.
त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर ही माझी पहिली सदिच्छा भेट होती. मी पुन्हा त्यांची भेट मागितली आहे. त्यांनी भेटीसाठी वेळ दिला आहे, असेही आव्हाड यांनी सांगितले.