लंडन : किंग चार्ल्स तिसरे आणि राणी कॅमिला यांचा शनिवारी ब्रिटनमध्ये राज्याभिषेक होत आहे. जगातील निवडक लोकांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात अनेक भारतीयांचा सहभाग असणार आहे.
किंग चार्ल्स यांच्या राज्यारोहणाबाबत ब्रिटनमधील भारतीयांमध्येही उत्सुकता व्यक्त होत असून पंतप्रधानपदावर भारतीय वंशाचेच ऋषी सूनक विराजमान असल्याने या भव्य समारोहामध्ये भारतीय वंशियांचा सहभाग दिसणार आहे. या समारोहात ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या अनेक भारतीय वंशाच्या नागरिकांना निमंत्रण आहे.
भारतात ब्रिटिशराज असल्यापासून राजसत्तेच्या कार्यक्रमांमध्ये भारतीयांचा सहभाग आहे. ही पद्धत व्हिक्टोरिया राणीने सुरु केली होती. राजघराण्याने आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना सुरक्षा रक्षकांमध्ये भारतीय सैनिकांचा समावेश असायचा.
व्हिक्टोरिया अँड अब्दुल या पुस्तकाच्या लेखिका शर्बानी बसू यांच्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया राणीला भारताबद्दल विशेष प्रेम होते. राणीने भारताला कधीही भेट दिली नसली तरी निकटचा सहकारी अब्दुल करीम याच्यामुळे त्यांना भारताबद्दल विविध माहिती मिळत होती. राणी व्हिक्टोरिया यांना भारताबद्दल विशेष प्रेम असल्याने बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर ॲबे या दरम्यान निघणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीत राणीच्या रक्षक दलांमध्ये भारतीय सैनिकांचेही दल निश्चित असायचे.
शनिवारी होणाऱ्या राज्यारोहण समारोहात ब्रिटिश एम्पायर मेडल मिळालेल्या भारतीय वंशाच्या शेफ मंजू माल्ही यांच्यासह अनेक भारतीय वंशाचे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मंजू माल्ही ह्या एक व्यावसायिक शेफ असून २०१६ पासून ‘ओपन एज’ नावाच्या सेवाभावी संस्थेत काम करत आहेत. ही संस्था लंडनमधील ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी मदत करते.