मुंबई : मार्च ते ऑगस्ट या 6 महिन्यांसाठी कर्जदारांना आरबीआय मोठा दिलासा दिलेला आहे. कर्ज न भरण्याची मुदत आरबीआयने आणखी तीन महिने वाढवली आहे. आरबीआयच्या या घोषणेचा फायदा कोट्यवधी लोकांना होणार आहे.
कर्जाची सवलत आणखी तीन महिन्यांना वाढवली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता आणि सगळ्यांना हीच अपेक्षा लागून राहिलेली होती. याचसंदर्भातली चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. तीच महत्त्वाची घोषणा आज आरबीआयने केली आहे.
त्यामुळे ऑगस्टपर्यंत आता कर्ज भरलं नाही तरी चालणार आहे. सर्वसामान्यांच्या हातात पैसा रहावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. तसंच येणाऱ्या मान्सूनकडून खूप मोठ्या अपेक्षा असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सांगितलं. आज पत्रकार परिषद घेऊन दास यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या.
Read More करोना लशीच्या पुण्यात चाचण्या सुरू
कोरोनाच्या कचाट्यात सापडलेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी आरबीआयने पुन्हा मोठे निर्णय घेतले आहेत. रेपो दरात आरबीआयने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 4.40 टक्कांवर असलेला रेपो रेट आता 4.0 टक्क्यांवर आला आहे. रेपो रेट कपातीमुळे कर्जावरचं व्याज आणखी कमी होणार आहे.
तसंच रिव्हर्स रेपो दरात देखील आरबीआयने पुन्हा 40 बेसिस पॉइंटची कपात केली आहे. त्यामुळे आता रिव्हर्स रेपो दर कमी होऊन 3. 35 टक्के झाला आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने हे मोठं पाऊल उचललं आहे.