राजीव गांधी यांनी डिजिटल इंडियाचा पायाच घातला नसता तर आज कोरोना संकटातील ‘अस्पृश्य’ काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, अधिकारीवर्गाचा संवाद होऊ शकला नसता
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनीही आत्मनिर्भर पॅकेजबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. परंतु, दुसरीकडे उद्योगपती पळून जाणे हे आता नव्या आत्मनिर्भरतेकडे जाणार्या हिंदुस्थानला परवडणारे नाही. काळा पैसा आणावा व गरिबांना वाटावा अशी एक स्वप्न योजना मोदी यांनी मांडली होती त्यावर काम करण्याची संधी कोरोना संकटाने दिली आहे, असा सल्लावजा टोला शिवसेनेने पंतप्रधान मोदींना लगावला आहे.
लॉक डाऊन 4 चे सुतोवाच करताना पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर करूनही शेअर बाजाराच्या बैलाने साधे शेपूटही का हलवले नाही?, अशी विचारणा सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. भांडवलदार, गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असून त्यांना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी विश्वास आणि अभय दिलेच पाहिजे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
Read More दोन वर्षाच्या मुलीला आणि गरोदर बायकोला घेऊन 800 किलोमीटरचा प्रवास
पंतप्रधानांचे 20 लाख ‘कोटीं’चे पॅकेज याच लघू, मध्यम आणि छोटे उद्योजक तसेच व्यावसायिकांना आधार देण्यासाठी आहे. गरीब, मजूर, शेतकरी, नियमित कर देणार्या मध्यमवर्गीयांनाही या पॅकेजचा लाभ मिळेल, असे भासवण्यात आले आहे. 20 लाख कोटी हे देशातील 130 कोटी लोकसंख्येत वाटले जातील व त्यातील गरीब, मध्यमवर्गीयांना या पॅकेजचा लाभ मिळेल, असे पसरवले गेले आहे. या 20 लाख कोटीतून हिंदुस्थान स्वावलंबी बनेल. म्हणजे तो आता स्वावलंबी नाही काय?, असा सवाल विचारण्यात आला आहे.
आज पीपीई किटस् बनविणार्या आयसीएमआरसारख्या विज्ञान संस्था याच आत्मनिर्भर हिंदुस्थानच्या भाग आहेत. तेव्हा पंडित नेहरू होते, आज मोदी आहेत. राजीव गांधी यांनी डिजिटल इंडियाचा पायाच घातला नसता तर आज कोरोना संकटातील ‘अस्पृश्य’ काळात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान, मुख्यमंत्री, अधिकारीवर्गाचा संवाद होऊ शकला नसता, असा टोलाही मोदींना लगावण्यात आला आहे.