औरंगाबाद : औरंगाबादमधील पदवी-पदव्युत्तर परीक्षेतील गोंधळाप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचा इशारा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. पदवी परीक्षेतील ही फार मोठी चूक आहे. ही चूक विद्यापीठाकडून झाली की, महाविद्यालयाकडून याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
एका बाकावर तीन विद्यार्थ्यांना बसवून त्यांना एक प्रश्नपत्रिका देणे, ही फार चुकीची गोष्ट आहे. जागा कमी असल्याने महाविद्यालयातील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना एक बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवणे हे चुकीचे आहे. हे ढिसाळ नियोजन कुणामुळे झाले, जाणीवपूर्वक झाले का? या संदर्भात सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
एका बाकावर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवल्याने त्यांचेच नुकसान झाले. त्यामुळे या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात, अशा सूचना देखील सामंतांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला. याप्रकरणाचा तपास करून याचा अहवाल २४ तासांमध्ये आला पाहिजे, असा आदेश सामंत यांनी विद्यापीठ सहसंचालकांना दिला आहे. कुलगुरूंना देखील याप्रकरणात कोण दोषी आहे, याची माहिती आम्हाला संध्याकाळपर्यंत पाहिजे, या प्रकरणात जो कोणी दोषी राहील त्यावर कारवाई होईल, असे सामंत म्हणाले.
याला परीक्षा म्हणायची का?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी आज अक्षरश: सावळा गोंधळ पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी आल्याने एका बेंचवर तीन-तीन विद्यार्थ्यांना बसवल्याचा अजब प्रकार पाहायला मिळाला. परीक्षा केंद्रावरील चित्र पाहिल्यानंतर याला परीक्षा म्हणायची का? असा सवाल उपस्थित होत आहे.
दोन वर्षांनंतर ऑफलाईन परीक्षा
कोरोनानंतर मराठवाडा विद्यापीठाची पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा होत आहे. यामुळे विद्यापीठाने यामध्ये काही निष्काळजीपणा केला का? कॉलेजने निष्काळजीपणा केला का? यावर चौकशी करून कारवाई केली जाईल.
पुन्हा परीक्षा घ्या
मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला याप्रकरणी आजचा पेपर पुन्हा नव्याने घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एका बाकावर तीन-तीन विद्यार्थी त्यात एकच प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे सामंत म्हणाले. एका बाकावर तीन-तीन जण होते, ही काही परीक्षेची पद्धत असू शकत नाही. त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याची सूचना सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे.