मुंबई : नवरदेवाच्या गाडीसमोर व-हाडी नाचत होते. थार गाडीसमोर नाचणा-यांना चक्क त्याच गाडीने चिरडले. या घटनेने एकच खळबळ उडाली.
उल्हासनगरच्या शांतीनगरमध्ये ही घटना घडली. यामध्ये १२ व-हाडी जखमी झाले आहेत. त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यातल्या उल्हासनगरमध्ये एक लग्नसमारंभ पार पडत होता. सगळे उत्साहाचे वातावरण होते. नवरदेव थार गाडीमध्ये होता. नवरदेवासमोर व-हाडी मंडळी नाचत होते. अचानकपणे थार गाडीने पिकअप घेतले आणि नाचणा-या व-हाडींना चिरडले. या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर पोलिसांनी थार गाडी ताब्यात घेतली. नेमका अपघात कसा घडला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये बहुतांश महिलांचा समावेश असून गाडी ऑटोमॅटिक असल्याचे सांगितले जात आहे.