शनिवार-रविवार शाळांना सुट्टी नसेल : राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातील ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील
मुंबई – राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटा दरम्यान मार्च महिन्यापासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर शाळेच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या होत्या. पण आता राज्य सरकार १५ जूनपासून शाळा सुरु करण्याच्या विचारात असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
राज्यातील शाळा सुरु झाल्यानंतर आठवड्यातील ४८ तास त्या सुरु ठेवल्या जातील. म्हणजे शनिवार-रविवार अशी सुट्टी देणाऱ्या शाळांना ती मुभा नसेल असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. देशात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु आहे. अशात मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरे ही रेड झोनमध्ये आहेत. पण टप्प्यात राज्यातील शाळा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर शाळा दोन शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार असल्याचेही संकेत वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत दिले आहेत.
Read More हिंगोलीत एकाच दिवशी 50 कोरोनाबाधित वाढले
शाळा सुरु करताना दोन पर्यांयाचा सध्या विचार सुरु असून त्यानुसार पहिला पर्याय म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबर प्रमाणे दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात बोलवायचे. तर दूसरा पर्याय म्हणजे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे दोन्ही गटांना एक दिवसाआड शाळेत बोलवायचे. आता राज्य सरकार या दोन पर्यायांचा विचार करत आहे. तसेच शाळा सुरु झाल्या तरीही एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल याची काळजी शाळांना घ्यायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.