पुणे : राज्यात वादळी वा-यासह गारांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतक-यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान राज्यामध्ये पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतक-यांची चिंता वाढली आहे.
दरम्यान राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि नगर जिल्ह्यात वादळी वा-यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातही हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी वा-यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर तुरळक ठिकाणी वादळी वा-यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. २० मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दोन दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यात वीज पडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.