मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच एकनाथ शिंदे यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली नाही, असा गंभीर आरोप सुहास कांदे यांनी केला होता. कांदे यांच्या आरोपाला माजी कृषिमंत्री दादा भुसे यांनी दुजोरा दिला आहे. सुहास कांदेंनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. मात्र, तरीही एकनाथ शिंदे यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
सुहास कांदेंनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली होती. त्या बैठकीत मीही उपस्थित होतो. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पालकमंत्री म्हणून काम करताना एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांच्या संघटनांकडून धमक्या येत होत्या. यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीतही चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना सुरक्षा द्यावी, अशीही चर्चा झाली. मात्र, त्यांना सुरक्षा देण्यात आली नाही, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.
सुहास कांदेंनी काय आरोप केले आहेत?
‘‘ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी ८.३० वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असे सांगितले,’’ असा दावा सुहास कांदे यांनी केला होता.
तसेच ‘‘एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जिवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? याउलट जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली?’’, असा प्रश्नही कांदे यांनी उपस्थित केला होता.