मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले आहेत. पत्रकार वारिसे यांच्या हत्येचा मुद्दा उचलाल तर तुमचाही शशिकांत वारिसे करू, अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. राऊत यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.
वारिसे यांच्या कुटुंबाला भेटायला न जाण्याची ताकीद देखील संजय राऊत यांना देण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
संजय राऊत म्हणाले, शशिकांत वारिसे यांचा विषय उचलू नका म्हणून मला धमकी आली. या प्रकरणी मला सतत फोन येत आहेत. मात्र मी भीत नाही, मी जाहीरपणे हा विषय हाती घेतला आहे. मी कोकणात जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथल्या प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणा-या पत्रकार शशिकांत वारिसे यांचे हत्या प्रकरण सरकारला अडचणीचे ठरणार आहे. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानामुळे वारिसे यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
संजय राऊत म्हणाले, स्थानिकांचा या रिफायनरीला विरोध आहे. त्यामुळे शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे. पण जेव्हापासून राज्यातील सरकार बदलले आहे, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री लोकांना वारंवार धमकावत आहेत की कोणत्याही परिस्थितीत आम्ही रिफायनरी येथे घेऊन येणारच. जर याला विरोध कराल तर तो विरोध आम्ही मोडून काढू. अशा प्रकारच्या धमक्या जर सरकारकडून दिल्या जात असतील तर त्या ठिकाणचे जे गुंड आहेत त्यांना बळ मिळेल.