कल्याण : जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ शिवसेनेच्या रणरागिणी आशा रसाळ यांनी उद्धव ठाकरेंसाठी देवी मातेसमोर शपथ घेतली आहे.
दरम्यान, राज्यात ८ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे स्वत:हून मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. त्यानंतर निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे ठाकरे यांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावले. त्यानंतर राज्यात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
जोपर्यंत उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ शिवसेना कार्यकर्त्या आशा रसाळ यांनी घेतली आहे. मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकडे घातले.
‘‘आज महाराष्ट्रावर संकट आलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही’’ अशी शपथ रसाळ यांनी घेतली आहे.