उस्मानाबाद : शहरातील उरुसात चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उरुसात वळू उधळल्याने गोंधळ माजला, त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. उस्मानाबाद शहरातील ‘हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी रहे’ या उरुसात पहाटे तीन वाजता ही दुर्घटना घडली. भाविकांची प्रचंड गर्दी झालेली असतानाच यामध्ये एक वळू घुसला आणि तो उधळला.
त्यामुळे एकच गोंधळ उडाला, यामध्ये चेंगराचेंगरीचा प्रकारही घडला. यामध्ये १४ भाविक जखमी झाले आहेत. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळानंतर पहिल्यांदाच हा उरुस होत असून सर्वधर्मियांचा यामध्ये मोठा सहभाग असतो. दोन-तीन दिवसांच्या या सोहळ्यात रात्रभर विविध कार्यक्रमांनिमित्त भाविकांची येथे मोठी गर्दी असते. त्याप्रमाणे यंदाही या उरुसात मोठी गर्दी झाली होती.