मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी उद्या म्हणजेच ३० जून रोजी बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंबंधीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना राज्यपाल बहुमत चाचणीचे आदेश कसे देऊ शकतात, असा सवाल काँग्रेसने केला आहे. राज्यपालांचे हे वर्तन असंवैधानिक असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. शिवसेनेने राज्यपालांच्या याच आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक एका प्रलंबित याचिकेचे कारण दाखवत राज्यपालांनी लांबवली आहे. मग आता शिवसेना आमदारांची याचिकाही सुप्रीम कोर्टात प्रलंबित असताना बहुमत चाचणीचा आदेश राज्यपाल कसा देऊ शकतात, असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.
दरम्यान राज्यपालांचे हे वर्तन म्हणजे न्यायिक व्यवस्थेचे उल्लंघन असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. ते म्हणाले, ‘कोर्टात ११ जुलैपर्यंत प्रकरण प्रलंबित असताना लगबगीने या पद्धतीने त्यांनी फ्लोअर टेस्ट करण्याचे आदेश काढावेत हा मोठा चमत्कार आहे. हे संविधान आणि न्यायिक व्यवस्थेचे उल्लंघन आहे. ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी खेदजनक आहे. राज्यपाल हे भाजपचा अजेंडा लावून धरत आहेत.
आमचा गटनेता वेगळा असे म्हणणा-या शिंदेंना हा आखाडा विधानभवनात रंगवता येणार नाही. तिथे काय स्थिती होईल, हे सांगता येत नाही, असे वक्तव्य नाना पटोलेंनी केले आहे.
राज्यपालांनी आडकाठी केल्यामुळेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे, असा आरोप करताना नाना पटोले म्हणाले, ‘ विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत हायकोर्टाने भाजपाला फटकारले होते. त्यांची अमानत रक्कम जप्त केली होती. हे विधिमंडळाचे कामकाज आहे, आमच्याकडे यायचे नाही, असे हायकोर्टाने म्हटले होते. या प्रकरणी भाजप सुप्रीम कोर्टात गेला आणि तिथे हे प्रकरण पेंडिंग आहे.
सरकारकडून राज्यपालांना विनंती केली होती की, स्पीकरची निवडणूक लावायची आहे, परवानगी द्या. तेव्हा राज्यपालांनी लिहून पाठवले होते की न्यायिक प्रक्रियेत असल्यामुळे मला काही कारवाई करता येणार नाही. आता आजच्या बहुमत चाचणी सिद्ध करण्याच्या आदेशातही तीच स्थिती आहे. शिवसेनेने गटनेता बदलला आहे. आता विधानसभेत व्हिप कुणाचा होईल? एकिकडे राज्यपाल विधानसभा अध्यक्षाबाबत अशी भूमिका घेतात आणि एकाएकी रात्रीतून असं काय झालं की रात्रीतूनच फ्लोअर टेस्टचा निर्णय घेण्यात आला? असा सवाल नाना पटोलेंनी केला आहे.