नाशिक : भारताच्या संविधानानुसार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत लग्न करता येते. मात्र जिथे जिथे भाजप सत्तेत आहे, तिथे तिथे हा बेकायदेशीर कायदा बनवलेला आहे. प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचे रूप दिले जात आहे, पण जर कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? असा सवाल असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारला विचारला आहे.
असदुद्दीन ओवेसी हे कालपासून नाशिक दौ-यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत लव्ह जिहाद कायद्याविषयी सरकारवर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले की, भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश संविधानावर चालतो आहे. त्यामुळे संविधानानुसार कोणीही आपल्या आवडीनुसार विवाह करू शकतो, फिरू शकतो.
मात्र भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे, त्या ठिकाणी लव्ह जिहादचा कायदा बनवला जात आहे. मात्र जे कोणी लव्ह जिहाद म्हणत आहेत असे किती लोक भाजपमध्ये आहेत त्यांनी अशी लग्नं केली आहेत. मग तेव्हा कायदा कसा अवलंबणार? असा सवाल करत हा कायदा बेकायदेशीर असल्याचे ओवेसी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, संविधानानुसार प्रत्येक जण आपलं आयुष्य जगत आहे. त्यांना विवाह करण्याची परवानगी देखील संविधान देते, मग कोणी प्रेम करतंय तर तुम्हाला त्रास काय? प्रत्येक प्रश्नाला जातीयवादाचे रूप दिले जात आहे. लव्ह जिहादविषयी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. लव्ह जिहाद कायदा तुम्ही सिद्ध कसा करणार? तसेच धर्मपरिवर्तनाबाबत जुना कायदा आहेच. ज्यांना जे आवडतंय ते करू द्या.
बेरोजगारी, महागाईवर बोला
आपल्याकडे बेरोजगारी, महागाई आणि इतर खूप मुद्दे आहेत, त्यावर भर देणे आवश्यक असल्याचे ओवेसी म्हणाले. तसेच औरंगजेबबाबत राष्ट्रवादी आणि भाजपलाच विचारा असे म्हणाले. तर ईडीच्या कारवाया या भाजप काळात सर्वाधिक होत असून राज्यासह देशात इतरही विषय आहेत. तरुणांना नोकरी द्या, महागाई कमी करा, तुम्हाला फक्त नावाचं पडलंय, कामाचे काही नाही. हा राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा असल्याचे ओवेसी म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांबद्दल आदरच
दरम्यान प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, तो सर्वस्वी प्रकाश आंबेडकरांचा निर्णय असून आम्ही बाळासाहेबांचा आजही आदर करतो. वंचित समाजाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न होता. मात्र आता युती तुटली, यावर काय बोलू शकतो. आमच्यासोबतची युती का तुटली ती मोठी गोष्ट आहे, आता कसं सांगू? आम्ही आज पण बाळासाहेब आंबेडकरांचा आदरच करतो, त्यांनी कोणासोबत युती करावी हा त्यांचा निर्णय असल्याचे ओवेसी यांनी स्पष्ट केले.