पुणे : पुणे शहरात अपघातांचे सत्र संपताना दिसत नाही. अपघातांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्याने ही घटना घडली आहे. यात पाच महिलांचा मृत्यू झाला असून १३ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास घडली आहे.
एका लग्नात काम करण्यासाठी १७ ते १८ महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली.
त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांनाही त्याने धडक दिली. यात १३ महिला जखमी झाल्या. जखमी महिलांवर उपचार सुरू आहेत. यातील काही महिला गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुशीला देढे, इंदुबाई कोंडिबा कांबळे (वय ४६) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य नावे समजू शकली नाहीत.
लग्नकार्यासाठी आल्या होत्या महिला
खरपुडी फाट्यावर असणा-या मंगल कार्यालयात या १८ महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. या सगळ्या महिला पुण्यातील नसून पुण्याच्या आजूबाजूच्या गावातील आहेत. मंगल कार्यालय रस्त्याच्या दुस-या बाजूने असल्याने त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी या महिलांचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या महामार्गावरील अपघातात पाच महिलांना चिरडून चालक पसार झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने पसार होण्यात चालक यशस्वी झाला मात्र खेड पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.