औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील आमदार आणि शिवसैनिकांना काल भावनिक साद घातल्यानंतर आज औरंगाबादचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे उत्तर दिले आहे. आम्ही आतापर्यंत शिवसेनेत होतो, मात्र तुम्ही आम्हाला कधीही मोकळेपणाने भेटू दिले नाही. तुमच्या बंगल्याची दारे सर्वसामान्यांसाठी कधीच खुली नव्हती. काल ख-या अर्थाने वर्षा बंगल्याची द्वारे सर्वसामान्यांसाठी उघडली गेली.
लोकांमधून निवडून येणा-या आणि विधान परिषद, राज्यसभेवरील बडव्यांची आम्हाला मनधरणी करावी लागत होती,अशी खंत आमदार संजय शिरसाट यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. औरंगाबादमधून एकनाथ शिंदे यांच्या गटात एकूण पाच आमदार गेले आहेत. त्यापैकी औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघाचे हे आमदार असून पहिल्यांदाच बंडखोर आमदाराचे उद्धव ठाकरेंच्या नावाने पाठवलेले हे पत्र माध्यमांसमोर आले आहे.
पुढे पत्रात त्यांनी लहिले आहे की, खुद्द एकनाथ शिंदे यांनी आमच्या भावना समजून घेतल्या आहेत. मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवले आहे असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासन्तास बंगल्याच्या गेटवर उभे ठेवले जायचे. स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे.
मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान.. आमची ही सर्व गा-हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते.
त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना. आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.
या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचे माननीय बाळासाहेबांचे,धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्व जपणारे एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
काल तुम्ही जे काही बोललात. जे काही झाले ते अत्यंत भावनिक होते. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरे कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारे हे भावनिक पत्र लिहावे लागले.असा उल्लेख पत्रात केला आहे.