मुजफ्फरपूर (बिहार): बिहारमधील मुजफ्फरपूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील ब्रह्मपुरा भागातील ‘प्रसाद हॉस्पिटल’ या खाजगी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत होरपळून आणि गुदमरून चार जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी जिल्हा प्रशासनाने केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर मृतांचा आकडा १० च्या आसपास असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत अनेक रुग्ण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इतर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
मुजफ्फरपूर रुग्णालयातील आग आणि भीषणता
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी पहाटे ३:२० च्या सुमारास घडली. रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू विभागात अचानक एका मोठ्या आवाजासह स्फोट झाला. वेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. क्षणार्धात संपूर्ण आयसीयूमध्ये दाट धूर पसरला. घटनेच्या वेळी आयसीयूमध्ये १५ ते २५ रुग्ण दाखल होते, जे गेल्या आठवड्याभरापासून तिथे उपचार घेत होते.
दुर्घटना घडली तेव्हा रुग्णांचे नातेवाईक आणि प्रत्यक्षदर्शींनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. आग लागली तेव्हा आयसीयूमध्ये एकही अटेंडंट किंवा वैद्यकीय कर्मचारी उपस्थित नव्हता. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना वाचवण्याऐवी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मदतीसाठी ओरडत होते, मात्र त्यांच्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला कोणीही नव्हते. अखेर नातेवाईकांनी स्वतः जीवाची बाजी लावून आपल्या माणसांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. गंभीर बाब म्हणजे रुग्णालयातील फायर हायड्रंट यंत्रणा ऐनवेळी कुचकामी ठरली आणि तिथले अग्निशामक सिलिंडर कसे वापरायचे, हे कोणालाच माहिती नव्हते.
बचावकार्य, प्रशासकीय तपास आणि पोलीस कारवाई
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मोठ्या शर्थीने अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. जवळपास २० रुग्णांना सुखरूप बाहेर काढून इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. दुर्घटनेनंतर संपूर्ण रुग्णालय परिसर सील करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आगीचे नेमके तांत्रिक कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, काही मृतदेह गायब केल्याच्या आरोपांचीही चौकशी केली जात आहे.
मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी सुब्रत कुमार सेन यांनी सांगितले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आयसीयूमध्ये सुमारे १५ रुग्ण होते आणि जखमींवर इतरत्र उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आल्यास व्यवस्थापनावर कठोरत कठोर कारवाई केली जाईल. तसेच वरिष्ठ पोलीस अधीक्षक कांतेश कुमार मिश्रा यांनी स्पष्ट केले की, रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले असून तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत. दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
या भीषण दुर्घटनेनंतर मृतांच्या संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात जोरदार गदारोळ आणि गोंधळ घातला. रुग्णालयाबाहेर लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगीची तीव्रता एवढी भीषण होती की, सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात जळाल्याचा उग्र वास येत होता. सध्या शोध आणि बचावकार्य पूर्ण झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
















