नवी दिल्ली : पश्चिम आफ्रिकेतील सर्वात अस्थिर देशांपैकी एक असलेल्या मालीमध्ये पाच भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित जिहादी गटांच्या वाढत्या हालचालींमुळे आधीच अस्थिर असलेल्या या देशात ही घटना घडल्याने भारताने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ६ नोव्हेंबर रोजी त्या भागात घडली, जिथे गेल्या काही वर्षांपासून सशस्त्र गटांकडून अनेक हल्ले आणि अपहरणाच्या घटना होत आहेत. बामाको येथील भारतीय दूतावासाने स्थानिक अधिका-यांशी आणि संबंधित कंपनीशी संपर्क साधून भारतीय नागरिकांच्या सुरक्षित सुटकेसाठी तत्काळ प्रयत्न सुरू केले आहेत. मालीतील भारतीय दूतावासाने केलेल्या पोस्टद्वारे सांगितले की ६ नोव्हेंबर रोजी आमच्या पाच नागरिकांच्या अपहरणाची दुर्दैवी घटना घडली आहे.
दूतावास माली सरकार आणि संबंधित कंपनीसोबत मिळून त्यांच्या सुरक्षित आणि तात्काळ सुटकेसाठी प्रयत्नशील आहे. या पोस्टमध्ये एमईएइंडिया आणि पीएमओइंडिया या अधिकृत खात्यांनाही टॅग करण्यात आले आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की, भारत सरकार उच्च स्तरावरुन या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. नवी दिल्लीतील अधिका-यांनी सांगितले की, मालीतील भारतीय दूतावास स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि त्या भारतीय कामगारांची कंपनी यांच्याशी सतत संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालयदेखील त्या प्रदेशातील सुरक्षा स्थिती समजून घेण्यासाठी इतर देशांच्या दूतावासांशी आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांशी समन्वय साधत आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत.
माली अस्थिरतेच्या गर्तेत
माली हा पश्चिम आफ्रिकेतील सर्वाधिक अस्थिर देशांपैकी एक मानला जातो. गेल्या काही वर्षांत येथे अनेक लष्करी उठाव झाले आहेत. तसेच अल-कायदा आणि इस्लामिक स्टेटशी संबंधित जिहादी संघटनांची वाढती सक्रियता या देशातील सुरक्षेला गंभीर आव्हान ठरत आहे. विशेषत: उत्तर आणि मध्य माली भागात सरकारचे नियंत्रण अत्यंत मर्यादित असल्यामुळे विदेशी कामगारांचे अपहरण ही नित्याची बाब झाली आहे.

