कोलकाता: जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे पश्चिम बंगालमधील कल्पिता माझी (Kalita Majhi) यांनी सिद्ध करून दाखवले आहे. दुसऱ्यांच्या घरी झाडू-पोछा करून महिना २,५०० रुपये कमावणाऱ्या कल्पिता माझी आता थेट विधानसभेत पोहोचल्या असून त्यांची ही यशोगाथा सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरत आहे.
कल्पिता माझी यांचे आयुष्य अत्यंत संघर्षाचे राहिले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या गेली अनेक वर्षे लोकांच्या घरी घरकाम करत होत्या. महिना जेमतेम अडीच हजार रुपयांत त्या आपल्या संसाराचा गाडा ओढत होत्या. मात्र, समाजाप्रती असलेली त्यांची तळमळ आणि कामाची जिद्द पाहून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले.
पूर्व बर्धमान जिल्ह्यातील औसग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. एका सामान्य घरकाम करणाऱ्या महिलेला तिकीट मिळाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मात्र, कल्पिता यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आणि जनतेनेही त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना भरघोस मतांनी विजयी केले.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही कल्पिता माझी यांचा साधेपणा कायम आहे. “मी आजही एक सामान्य महिलाच आहे. गरिबांचे दुःख मला माहित आहे, कारण मी स्वतः त्यातून गेले आहे. आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवणे आणि विशेषतः महिलांच्या उत्थानासाठी काम करणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट असेल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
















