हिंगोली : सध्या राज्यातील वातावरणात बदल झाला आहे. अनेक ठिकाणी वादळी वा-यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. काल (बुधुवार) राज्यातील अनेक भागात वादळी पाऊस झाला.
उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना तरी या पावसापासून दिलासा मिळत असला तरी शेतक-यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. ंिहगोली जिल्ह्यातल्या केळी उत्पादकांचे या पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.
५०० हेक्टरवरील केळीच्या बागा या पावसामुळं जमीनदोस्त झाल्या आहेत.
बुधुवारी झालेल्या वादळी वा-यामुळे हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतक-यांंचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कारण या भागातील केळी हे पीक प्रमुख पीक मानले जाते. कालच्या वादळी वा-यामध्ये शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी स्वत: शेतक-यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
पाचशे हेक्टर शेतजमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. या शेतक-यांचे शंभर टक्के नुकसान झाले असल्याची माहिती वसमतचे तहसीलदार बोळंगे यांनी दिली आहे.
पुढच्या ४८ तासात मान्सून कोकणात येणार
दरम्यान, पुढच्या ४८ तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सूनच्या आगमनासाठी थोडा उशीर झाल्याचे दिसत आहे.