नवी दिल्ली : लोकसभेत आजही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान जोरदार गोंधळ झाला. चीनचा मुद्दा आणि भारत-अमेरिका ट्रेड डीलवर राहुल गांधी बोलत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. मी लोकसभेतील विरोधी पक्षनेता आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे, पण तरीही मला बोलू दिले जात नाही असा आरोप राहुल गांधींनी यावेळी केला.
या सर्व गदारोळात संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रंचड घाबरलेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला हा करार काल रात्री अचानक झाला. यावरुनच पंतप्रधान मोदींवर जबरदस्त दबाव असल्याचे दिसते. त्यांची प्रतिमा धोक्यात आली, त्यामुळेच त्यांनी तडजोड केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
देश विकल्याचा गंभीर आरोप
राहुल गांधी पुढे म्हणाले, या ट्रेड डीलमध्ये नरेंद्र मोदींनी तुमच्या मेहनतीचा सौदा केला आहे. त्यांनी देश विकला आहे. यावेळी राहुल यांनी अमेरिकेत सुरू असलेल्या अदानी प्रकरणाचा उल्लेख करत म्हटले की, अमेरिकेत अदानींवर असलेला खटला प्रत्यक्षात मोदींवरच आहे. तसेच, एपस्टीन फाइल्सचा संदर्भ देत, अजूनही काही माहिती जाहीर व्हायची असल्यामुळे सरकारवर दबाव आहे. ही दोन मोठी दबावाची कारणे आहेत. यावरूनच देशाने हे समजून घेतले पाहिजे की, पंतप्रधान घाबरलेले आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

