अमरावती : तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या झपाट्याने मिळालेल्या यशामुळे आपल्याला थोडा हेवा वाटल्याचे आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी म्हटले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, सध्या तामिळनाडूचे राजकारण पाहताना इतरांसाठी गोष्टी अधिक सोप्या वाटतात.
हसत-हसत ते म्हणाले मी आजकाल तामिळनाडूचे राजकारण पाहतो, त्यांनी किती सहजपणे हे सगळे केले आहे. मला थोडा हेवा वाटला. त्यांनी कटआउट्स आणि होलोग्रामचा वापर करून आनंदात विजय मिळवला. यानंतर त्यांनी सांगितले मी गेली १५ वर्षे रस्त्यावर फिरत संघर्ष करत आहे. पवन कल्याण यांनी पुढे सांगितले की, एखादा राजकीय पक्ष चालवणे म्हणजे हजारो-लाखो लोकांना एकत्र बांधून ठेवणे होय. आपण स्वत:च्या कुटुंबातील लोकांनाही एका मुद्यावर एकमत करू शकत नाही. अशावेळी पक्ष स्थापन करून समाज बदलण्याचा प्रयत्न करणे हे खूप मोठे धाडस आहे असे ते म्हणाले.
यापूर्वीही त्यांनी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या राजकारणातील तुलना फेटाळून लावली होती. अमरावती येथे पक्ष कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, या दोन्ही राज्यांच्या राजकारणाची तुलना होऊ शकत नाही. आंध्र प्रदेशसाठी आघाडीवर आधारित राजकारण अधिक योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले होते, जरी त्यासाठी अधिक वेळ लागत असला तरी. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फक्त एकच जागा मिळाली होती आणि स्वत: पवन कल्याण दोन्ही मतदारसंघांत पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे भविष्य काय असेल याबाबत चर्चा सुरू झाली होती. ‘पॉवर स्टार’ म्हणून ओळखल्या जाणा-या पवन कल्याण यांनी २०१९ नंतर संघटन मजबूत करण्यावर भर दिला आणि भाजप व तेलुगू देसम पक्षासोबत आघाडी केली. २०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जनसेना पक्षाने २१ जागांवर निवडणूक लढवून सर्व जागांवर विजय मिळवला. स्वत: पवन कल्याण यांनी पीठापूरम मतदारसंघातून ७० हजार मतांनी विजय मिळवला.
















